बुधवार, २२ मार्च, २०१७

कधी कधी

कधी कधी
मेरे दिल में खयाल आता है....... 
मनाला जसे पंख असतात ना 
तसे देहाला ही  पंख फुटावे 
हलके हलके व्हावे आणि आकाशभर विहरावे 
आपल्याला कुण्णीच  पाहणार नाही 
अशा एखाद्या निर्मनुष्य बेटावर स्थिरावे. 
आणि मग....... 
बिनधास्त मन मानेल तसे जगावे. 
चिखलाची पर्वा ना करता जमिनीवरच झोकून द्यावे 
आणि वर अंगभर पाऊस पांघरावे. 
साचलेल्या डबक्यातून लहानपणासारखे डुबुक डुबुक उड्या माराव्यात 
धोधो बरसणाऱ्या त्या सरी आपल्या अंगावर झेलाव्यात .. 
आणि कधी  हिरवळीच्या  मऊ गालिच्यावर मनसोक्त लोळावे. 
अनिर्बंध स्वप्नांमध्ये हरवून जावे. 
कधी कधी..... 
वाटतं वयाबरोबर शरीराला येणारी मर्यादा झुगारून द्यावी. 
कोणतीच  बंधने न मानावी. 
विकारांची चिंता ना करता, 
आवडेल ते आणि आवडेल तेवढे खादडावे 
मनसोक्त नाचताना, दुखणाऱ्या पायांची तमा नसावी. 
आणि नदीत डुंबताना आजारी पडण्याची काळजीही नसावी. 
 कधी कधी ...... 
असेही वाटून जाते कि 
आपल्याला आवडणाऱ्या व्यक्ती बरोबर खूप खूप बोलावे 
निर्मळपणे स्वतःला व्यक्त करून पुन्हा निर्मळच  व्हावे. 
सोशिकपणाचा आव आणणे सोडून द्यावे 
आणि कधीतरी  एकदा मनसोक्त रडून घ्यावे. 
कधी कधी ......... 
असेही वाटते कि  आजूबाजूचे माणसांचे जग थोडा वेळ अदृश्य व्हावे. 
आणि ते फक्त फुलं, पाखरांनी, पुस्तकांनी भरून जावे. 
त्या जगामध्ये आपण इतके हरवून जावे 
कि स्वतः हि स्वतःला ना सापडावे. 
कधी कधी......... 
खरंच मनाला कसे पंख फुटतात ना? 
कुठे हि नेत  मग ते आपल्याला ☺☻☺☺☺☺

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा