गुरुवार, १० ऑगस्ट, २०१७

प्रेम, प्यार, love

आज हा विषय घेण्याचे कारण म्हणजे नुकताच  आभासी जगातल्या एका मैत्रिणीशी झालेला वादविवाद. बाईसाहेब नेहमी रडव्या ( निराशाजनक/ नकारात्मक ) पोस्ट टाकण्यात पटाईत. तर त्यादिवशी पुन्हा त्यांनी आपले दुःख शेयर केले, " प्रेम बीम काही नसते फक्त एक फसवणूक असते".  मी विरोध केला तर मला म्हणाली कि तू शिक्षिका आहेस म्हणून साहित्यिक( पुस्तकी) बोलतेस. वास्तविक मी गणिताची/ विज्ञानाची शिक्षिका. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय काहीही बोलणार नाही. आणि साहित्याशी माझा संबंध फारसा आलाच नाही.
पण प्रेमाचा अनुभव मात्र पावलोपावली आला. कदाचित माझ्या मैत्रिणीचे ही बरोबर असेल. तिला जे प्रेम अभिप्रेत असेल ते स्त्री-पुरुषांमधील असेल. आणि माझ्या दृष्टीने प्रेम हे व्यक्ती-व्यक्ती मधील, आणि कोणत्याही दोन जीवांमधील आहे. म्हणून ते खूप सुंदर आहे. ती एक ऊर्जा आहे- जगण्याची ऊर्जा.दुसरा एक तरुण मित्र अगदी पुस्तकी किंवा फिल्मी वाक्य बोलला कि खरं प्रेम एकदाच होतं , तेही अर्थात पूर्णपणे मान्य नाही कारण प्रेम पावलोपावली होतं , फक्त त्याची रूपे वेगवेगळी असतात. आणि ती आपल्याला जगण्याचे बळ देऊन जातात .
 जेंव्हा नात्यातील चिल्ली पिल्ली आपण त्या घरी राहत नाही हे माहित असून ही, घरात पळत पळत शिरताना "ती मावशी कुठाय?" म्हणून सर्वात आधी विचारतात, ते प्रेमच असते त्यांचे. कदाचित आपल्यातील लहान मूल त्यांना आपलेसे वाटत असेल किंवा चौपट वयाची मावशी त्यांना एक चांगला श्रोता वाटत असेल. काय फरक पडतो?  जेंव्हा एखादा बालमित्र आपल्याला त्याच्या अनुपस्थितीत ही त्याच्या शिळ्या विनोदांनी  हसवू शकतो, आपल्या चेहऱ्यावर स्मित आणू शकतो. मग भले ही  तो त्याचा एकाकीपणा घालवण्यासाठी हे करत असेल, पण आपण तर फ्रेश होतो ना. जेंव्हा एखादी  जिवलग व्यक्ती  अनेक वर्षांनी भेटूनही त्याच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत असे भासवते , भलेही ती सर्वांशी तसेच वागत असेल किंवा तिच्या व्यवसायाचा तो एक भाग असेल सर्वाना प्रसन्न, आनंदी ठेवणे, पण आपल्या आयुष्यात तर चैतन्य निर्माण होतेच ना. एखादी मैत्रीण हक्काने भांडते आपल्याशी जेंव्हा, तिचा राग जरी लटका असला, क्षणिक असला तरी त्यातून तिचे आपल्यावरील प्रेमच  व्यक्त होते.
आपण अनेकदा प्रेमात पडतोच. एखाद्या लहानग्याच्या बाललीलांच्या , एखाद्या सुंदर चित्राच्या, एखाद्या हळव्या सुरेल गीताच्या, अनेकवेळा पाहिलेल्या इंद्रधनुच्या, पांढऱ्या शुभ्र हिमाच्छादित शिखरांच्या, घनदाट हिरव्यागार जंगलाच्या, भावपूर्ण कवितेच्या, हृदयस्पर्शी शब्दांच्या, नाजुकश्या फुलपाखराच्या, इवल्याश्या पक्ष्याच्या , फुलांच्या रंगांच्या किंवा स्पर्शाच्या, मोहक सुगंधाच्या , आपल्याच मनातील खेळाच्या, स्वप्नांच्या  . . . . .
बुरख्याआडून दिसणाऱ्या त्या गहिऱ्या डोळ्यांना धारण करणाऱ्या त्या नितळ सौन्दर्याची कल्पनाच आपल्याला त्याच्या प्रेमात पाडून जाते. तर आत्मविश्वासाने पाऊले टाकणारी एखादी आधुनिका  आपल्याला कधी कधी मागे वळून पाहण्यास भाग पाडते ( मी स्त्री असले म्हणून काय झाले, सौन्दर्य मलाही मोहित करू शकते) एखाद्या व्यक्तीची विशिष्ट लकब, त्याचे वेडसर वागणे, किंवा प्रभावशाली शब्दभांडार आपल्याला भुरळ पाडते.
एखादी कादंबरी वाचताना किंवा एखादी कथा पाहताना आपण त्यातील पात्रांच्या प्रेमात पडतो.
आणि सर्वात महत्वाचे आपण स्वतःवर तर अतोनात प्रेम करतोच ना. कदाचित कोणालातरी वाटेल  कि स्वतःवर प्रेम? किती आत्मकेंद्री विचार? पण आपण जितके  स्वतःवर प्रेम करू ना तितकेच ते सहजतेने आपल्याला इतरांवर करता हेते आणि इतरांना आपल्यावर. वागण्याबोलण्यात आत्मविश्वास येतो, आणि सकारात्मकता येते. असं नाहीये कि या सर्वामुळे आयुष्य एकदम सहज सोपं होईल, काही त्रासच उरणार नाही, अडचणी येणार नाहीत,  पण त्यातून मार्गही सापडत जातील. ते मार्ग मनाजोगते सापडले तर आनंदात भर पडते नाहीतर अनुभवात ( शेवटचे विधान कोठेतरी वाचलेले, भावलेले म्हणून ढापलेले 😉😜)
तर हा  आहे प्रेमाविषयीचा माझा दृष्टिकोन. कदाचित सर्वाना नाही पटणार, कदाचित बरेच कंगोरे राहून ही गेले असतील पण आहे हे असं आहे.