बुधवार, ७ जून, २०१७

अविस्मरणीय

आज विषय वेगळा जरासा. म्हणजे माझ्या आयुष्यातील माणसांबद्दल नाही तर एक अविस्मरणीय प्रवास अनुभव. आयुष्यात थोडेसे स्थिरावल्यानंतर ठरवले कि हात पाय धड आहेत तोपर्यंत देशाटन करून घ्यावे. अर्थात सध्या तरी हे देशाटन आपल्या देशापुरतेच मर्यादित आहे. कारण ज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना कधी कधी आपला विषय सोडून इतर ही गोष्टींचे ज्ञान, किमान आपल्या देशाचे तरी ज्ञान, आपल्याला असावेच असे वाटते. आणि तेवढाच रोजच्या आयुष्यात थोडासा बदल. म्हणजे पुढील गाडा रेटायला रिचार्ज होणे थोडक्यात.
महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असल्याने दक्षिण भारत झाले बऱ्याच वेळा. उत्तरेत मात्र हिमाचल सोडून फारसे फिरलो नव्हतो. प्रशिक्षणाच्या निमित्ताने आणि लहानपणी वास्तव्याच्या निमित्ताने दिल्ली, आग्रा, मथुरा ही झाले होते पण हिमालयाची विविध रूपे उलगडायची होती अजून. त्यात सुटी फक्त मे मध्ये. त्यावेळी बराचसा उत्तर भाग अतिशय तापलेला असतो त्यामुळंही थंड ठिकाण निवडणे गरजेचे होते. 
नेहमी सोबत असणाऱ्या मित्र परिवाराने खूप अभ्यासाअंती सिक्कीम हा पर्याय ठेवला समोर. अर्थातच सिक्कीम आम्हालाही अनोळखी होते त्यामुळे कुतुहूल ही  होते  त्याबद्दल. पण त्या कुटुंबाला ३ दिवस ट्रेन चा प्रवास जमणार नव्हता, म्हणजे त्यांचा स्टॅमिना नव्हता म्हणा तितका, म्हणून जाता येता  विमानाने जायचे ठरले. बाब खर्चिक होती. बजेट  पाहावे लागणार होते म्हणून माझा नकारच होता कारण आम्ही चौघे जाणार म्हणजे वार्षिक बजेट फक्त तिकिटालाच फस्त होत होते. पण शेवटी पतिदेवांचा हट्ट. ते त्यांच्या बालमित्राला नकार देऊ शकत नव्हते. म्हणून आम्ही सिक्कीमला जाणार हे ठरले. धाकट्याचा पहिला विमान प्रवास म्हणून तो जरा जास्तच उत्साही होता. 
९ मे रोजी  पुण्यापर्यंत बसने प्रवास करून १० मे ला  पहाटे ३ वाजता कोलकात्यासाठी   विस्तारा  चे विमान बोर्ड केले. मी, श्रुती आणि पतीदेव सोडून सर्वांचा पहिला विमान प्रवास असल्याने बाकीच्या  ४ जणांच्या मनात खूप काही उलटसुलट  चालले होते.  विस्ताराची सेवा अतिशय उत्तम, म्हणजे अगदी खाण्यापिण्यासह जे हल्ली बऱ्याच कंपन्या देत नाहीत. 
१० तारखेला सकाळी ६ वाजता कोलकात्यात पोचलो तिथून टॅक्सिवाल्याने विमानतळाजवळच्याच एका चांगल्या हॉटेल मध्ये नेले. बजेट मधले, स्वच्छ आणि जवळचे, सोयीचे. कारण दुसऱ्यादिवशी दुपारी पुन्हा बागडोगरा साठी विमान पकडायचे होते. . प्रिबुकिंग वगैरे आम्ही काही केले नव्हते. कारण आम्हाला आमचा प्रवास नेहमी लवचिक ठेवायचा असतो आणि नव्या ठिकाणी प्रत्यक्ष पोचल्यानंतर चौकशी करून प्रत्यक्ष पाहून प्लॅन करणे जास्त योग्य वाटते. हॉटेल छानच होते. आणि त्यांचा कॉम्प्लिमेंटरी नाश्ता ही एकदम स्वच्छ आणि अमर्याद. त्यात रोजच, इडली, उत्तप्पा, शिरा, कॉर्नफ्लेक्स, सॅलॅड, सँडविच अशी भरपूर चॉईस , अर्थात बुफे पद्धतीने.
नाष्टा झाल्यानंतर तिथेच समोरच्या रिसेप्शन काउंटर वर चौकशी केली ,कोलकाता पर्यटनाविषयी, आणि टॅक्सी करून प्रथम व्हिक्टोरिया मेमोरियल हाल पाहायला गेलो. राणी व्हिक्टोरियाच्या मृत्यूनंतर तत्कालीन व्हाइसरॉय जॉर्ज कर्झन याने राणीचे भव्य स्मारक उभारण्याचा प्रस्ताव मांडला आणि मग विस्तीर्ण बाग आणि संग्रहालय असणारे हे भव्य स्मारक १९२१ ला लोकांसाठी खुले झाले. या स्मारकामध्ये एकूण २५ दालने आहेत. वेगवेगळ्या दालनांमधून राजघराण्यातील व्यक्तींची छायाचित्रे, शिल्पे, राष्ट्रीय नेत्यांचा इतिहास, तत्कालीन हत्यारे आणि कोलकात्याच्या इतिहास मांडण्यात आला आहे. स्मारकाबाहेरच्या ६४ एकरात पसरलेल्या बागेत ही  विविध शिल्पे आहेत. स्मारकाच्या इमारतीवर सुद्धा विविध चित्ताकर्षक शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. बागेचे व्यवस्थापन हि बऱ्यापैकी आहे, पण उत्तम नाही म्हणता येणार .

व्हिक्टोरिया मेमोरियल पाहिल्यानंतर आम्ही बसने प्रवास करायचे ठरवले आणि बसने मग हावड्याला गेलो. जगप्रसिद्ध हावडा ब्रिज पाहायला. कोलकात्याच्या बस चा प्रवास टॅक्सी पेक्षा ही सोयीचा आणि स्वस्त. . तिथे पुलावर एक फेरी मारली, तिथली काही फळे घेतली( सुमेधच्या आवडीचे जाम्ब आणि लीची तिथे भरपूर मिळाली खायला, बाळाने मनमुराद ताव मारला). आणि तिथून बसनेच बेल्लूर मठाकडे गेलो. एका गोष्टीचा इथे उल्लेख करावासा वाटतो कि कोलकात्यात, पोलीस, विद्यार्थी, किंवा नागरिक सगळेच छान सहकार्य आणि मदत करणारे भेटले, कोठेच काहीच अडचण आली नाही, प्रवास करण्यात किंवा माहिती घेण्यात.

बेल्लूर मठ म्हणजे  रामकृष्ण मिशन  आणि मठाचे मुख्यालय. याची स्थापना स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे मुख्य शिष्य स्वामी विवेकानंद यांनी केली. हुगली नदीच्या पश्चिम तीरावर हे मठ वसलेले आहे. परिसरामध्ये असणारे प्रमुख मंदिर हे अतिशय सुंदर, हिंदू, ख्रिस्ती आणि इस्लामिक स्थापत्यशास्त्राचे मिश्रण असलेले मंदिर, रचनेत सुद्धा सर्व धर्म समभाव दाखवते. स्वामी विवेकानंदानी संपूर्ण भारत फिरून विविध स्थापत्यकलांचा अभ्यास केला आणि  त्यावेळी सिविल इंजिनिअर असणारे स्वामी विजनानंद यांनी त्यांच्या कल्पनेनुसार बेलूर मंदिराचे डिजाईन तयार केले.
बेलूर मठाच्या ४० एकराच्या परिसरात, स्वामी रामकृष्ण परमहंस, त्यांच्या पत्नी शारदा देवी आणि स्वामी विवेकानंद यांची मंदिरे आहेत. तसेच रामकृष्ण मिशन चे मुख्यालय , आणि या मिशन आणि मठाचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय ही आहे. मठाला लागूनच एका विस्तीर्ण परिसरामध्ये, मिशन शी संलग्न असलेल्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. नदीतीरावर वसलेला मठाचा परिसर अतिशय विलोभनीय असा आहे. तिथून उठावेसे वाटतच नव्हते. नदीतून पलीकडे दक्खिनेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी नावेची सुविधा उपलब्ध आहे, पण त्यादिवशी नेमकी कोणत्या तरी कारणास्तव ती सेवा बंद होती, त्यामुळे आम्हाला दक्खिनेश्वर  ला जाण्यासाठी पुन्हा मठाच्या बाहेरून बस पकडावी लागली.

दक्खिनेश्वर काली मंदिरात आम्ही नेमके सायंआरतीच्या  वेळी पोचलो. भारावून जाण्यासारखे वातावरण होते. मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि प्रशस्त होता, मुख्य मंदिर सोडून आणखी छोटी छोटी मंदिरे होती तिथे. 12 ज्योतिर्लिंगांची १२ छोटी मंदिरे. शिवाय आणखीही काही मंदिरे. अगदी भारावलेले वातावरण.
तिथून आम्ही हॉटेल वर गेलो. इथेच सहलीतील प्रथम दिवस संपला. सोबतचे मित्र नव्याचा अनुभव घेण्यास फारसे तयार नसल्याने आणि खूपच साशंक असल्याने खाण्यापिण्याच्या बाबतीत फारसे प्रयोग नाहीत करता आले. फक्त पंजाबी डिशेस सर्वत्र खाव्या लागल्या, अगदी बंगाल आणि सिक्कीम मध्ये सुद्धा. त्यातल्या त्यात समाधानाची बाब इतकीच कि यावेळी त्या कुटुंबानेही पूर्णपणे शाकाहार अवलंबला.
 दुसऱ्या दिवशी ११ मे रोजी  दुपारी १ वाजता कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावरूनच बागडोगरा साठी स्पाईसजेट चे विमान होते. ५० मिनिटांच्या प्रवासानंतर बागडोगरा लष्करी विमानतळावर पोहोचलो. तिथे एका व्यक्तीशी पूर्वीच बोलणी झाल्यामुळे तिथे टॅक्सी पोचली आणि टॅक्सीने मग गंगटोक कडे प्रस्थान. साधारण ४ तासांच्या तिशता नदीच्या सोबत केलेल्या  निसर्गरम्य प्रवासानंतर गंगटोक ला सायंकाळी ६ च्या सुमारास पोहोचलो. तिथेही पूर्वीच एजन्ट शी बोलणी झाल्यामुळे. हॉटेल बुकिंग झालेले होते. फ्रेश होऊन संध्याकाळचे जेवण घेतले. आणि एजन्ट शामशी दुसऱ्यादिवशीच्या नियोजनाविषयी बोलणे झाले आणि त्यानंतर विश्रांती. संपूर्ण सिक्कीमच थंड हवेचे ठिकाण असल्यासारखे वाटत होते. मे मध्ये ही छान पावसाचा शिडकावा आणि बरीच थंडी होती. ११ मे म्हणजे श्रुतीचा वाढदिवस. यावर्षी तो कोलकाता आणि सिक्कीम मध्ये साजरा झाला.
श्यामच्या सूचनेनुसार पहिल्यादिवशी आम्ही स्थानिक साईट सिईंग केले. पूर्ण दिवसासाठी टॅक्सी बुक केल्या. सिक्कीम मध्ये फ्लॉवर एक्सिबिशन , इंचे मोनेस्टरी, ताशी व्ह्यू पॉईंट, बनजाखरी वॉटरफाल्स , तिबेटी संग्रहालय, गणेश टोक  ( मंदिर), ट्री प्लांटेशन,ल्हासा वॉटर फाल ,गोन्जान्ग मोनेस्टरी, इ. ठिकाणे पहिली. फ्लॉवर शो मध्ये अनेक सुंदर सुंदर फुलांचे प्रदर्शन मांडलेले होते. विविध रंगी, विविध ढंगी अशी खूप सारी फुलेच फुलेच एका डोम मध्ये मांडलेली होती. मधेच एक कारंजा विलोभनीय दिसत होता.  pachiopedilum ,hirsutissimum, lilium ,bromeliads अशा विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुले तिथे पाहावयास मिळाली. शो च्या बाहेरील बाजूस स्थानिक स्त्रिया  सिक्कीमचा पारंपरिक वेष बक्खू घेऊन बसल्या होत्या जे पर्यटकांना भाड्याने उपलब्ध करून देण्यात येत होते. आम्ही सातही जणांनी तो वेष परिधान करून भरपूर फोटो काढून घेतले. ते भडक रंगाचे, चमकदार पोशाख, एकतर सर्व पर्यटकांचे आकर्षण होते, तसेच तिथल्या स्थानिकांचे उत्पन्नाचे एक महत्वाचे साधन. सिक्कीम मधल्या प्रत्येक पॉइंटवर ते पोशाख उपलब्ध होतेच पण फ्लॉवर शो च्या ठिकाणी सर्वात सुंदर रंगांचे मिळाले. त्यानंतर ताशी व्ह्यू  पॉईंटला ही  छान होते, पण एकाच रंगात.
त्यानंतर उल्लेखनीय स्थळे म्हणजे गणेश मंदिर, आणि ताशी व्ह्यू पॉईंट इथले दृश्यही  अगदीच विलोभनीय होते. उंचावरून समोरील, दरी  डोंगर यांचे सौन्दर्य डोळ्यात साठवून ठेवण्यासारखे दिसत होते. आणि सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बनजाखरी  धबधबा. उंचावरील सुंदर अशा धबधब्या भोवती मानवनिर्मित पिकनिक स्पॉट निर्माण केले होते. साधारणपणे ७० फुटांवरून कोसळणारा धबधबा, वरती निमुळती धार आणि खाली त्याचाच विस्तार झालेला, अगदी मोरपिसाऱ्यासारखा. भोवतालच्या परिसरामध्ये बनजाखरी जमातीची वैशिष्ट्ये दर्शवणारी रचना केली होती. बन्जाखारी म्हणजे वनवासी पुजाऱ्यांची अशी एक जमात ज्यांच्याकडे रोगनिवारणाची दैवी शक्ती होती. अशी मान्यता आहे कि त्यांचे आत्म्यावर  नियंत्रण होते . या धबधब्याचा परिसरामध्ये या जमातीची उपचारशैली, अध्यात्मिक जीवनशैली दर्शवणारी काही शिल्पे आहेत. इथे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ही उपलब्ध आहेत. थोडक्यात हे निसर्गरम्य ठिकाण, धबधबा, एनर्जी पार्क आणि थीम पार्क म्हणून प्रसिद्ध आहे. खाण्यासाठी मात्र इथे फक्त मोमोस, नुडल आणि फ्राईड राईस मिळेल. काही ठिकाणी फुलके ही मिळत होते .
सिक्कीम मधला दुसरा दिवस मात्र अगदीच अविस्मरणीय ठरला. त्यादिवशी आम्हाला नथुला पासला जाण्याची संधी मिळाली. सर्वाना ही संधी मिळत नाही कारण रोज फक्त ७० वाहनांना पासिंग मिळतं तिथे जायला.गंगटोक पासून सुमारे ५४ किमी अंतरावरील आणि  समुद्रसपाटीपासून १४,४१० फूट (४३१०मी ) उंचीवरील हे ठिकाण म्हणजे भारत आणि चीन यांच्यामधील सीमा रेखा. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर   या मार्गे चीनशी होणाऱ्या व्यापारावर बंदी घालण्यात आली होती, म्हणजे हा मार्गच बंद करण्यात आला होता पण २००६ पासून मात्र पुन्हा सुरु करण्यात आला हा मार्ग. इतक्या उंचीवर उणे तापमानात आणि अगदी कमी वातावरणीय दाब असताना, ऑक्सिजनची कमतरता असताना आपले सैनिक तिथे अहोरात्र खडा पहारा देत असतात, याचे फार कौतुक वाटते. कारण तिथेपर्यंत चढून गेल्यानंतर आणि थोडा वेळ तिथे काढल्यानंतर आमच्यातील पुरुष मंडळी पार ढेपाळली. पूर्णपणे हिमाच्छादित असा पांढराशुभ्र परिसर, चांगलीच जाणवणारी थंडी, आपल्या सैनिकांचा तो रुबाबदार अवतार, चीनचे नागरिक आणि त्यांचे सैनिक यांच्याशी झालेली किरकोळ अभिवादनाची देवाणघेवाण, ..... सारेच अगदी अविस्मरणीय.
तिथून साधारण  १००० फूट खाली आल्यानंतर बाबा मंदिर नावाचे ठिकाण लागते. थोडेसे पायी चढून गेल्यानंतर एक सुंदर पांढरीशुभ्र शिवमूर्ती, व त्याच्याशेजारीच फेसाळत धबधबा, अगदी स्वच्छ काळे कभिन्न कातळ . खूपच सुंदर दृश्य. पण तिथंपर्यंत फक्त आम्ही स्त्रियाच गेलो कारण बाकी सगळी मंडळी थकली होती. तिथून आणखी थोडे खाली आल्यानंतर छांगु लेक हे ठिकाण. शुभ्र पर्वतांनी वेढलेले ते नितळ सरोवर फार सुंदर वाटले. तिथेच याक ची सवारी स्थानिकांनी उपलब्ध करून दिली आहे. आणखी एक नवा अनुभव तो ही.
सिक्कीम मधला तिसरा दिवस गंगटोक पासून सुमारे १२५ किमी अंतरावरील लाचुंग या गावी . गंगटोक पासून फक्त १२५ किमी अंतर असले तरी रस्ता इतका वाईट आणि खडकाळ होता कि जायला ५ ते ६ तास सहज लागतात. ३२०० मी उंचीवर वसलेले हे गाव सिक्कीम मधले सर्वात सुंदर गाव मानले जाते. चहुबाजूनी हिमालयाच्या शिखरांनी वेढलेले हे गाव अप्रतिम दिसते, मात्र इथली थंडी आपल्याकडच्या लोकांना अगदीच जीवघेणी. रूम हीटर सुद्धा तिथे निष्प्रभ ठरतो. तिथल्या लोकांचे आतिथ्य आणि माणुसकी मात्र अगदी कुठेच दिसून आली नाही. पर्यटकांशी उद्धट वर्तन, राहायला आलेल्याना  व्यवस्थित सोयी ना पुरवणे हा अनुभव निदान आम्ही थांबलेल्या ठिकाणी तरी सर्वच पर्यटकांना आला. अंघोळीला गरम पाण्याची सोया ही न करून दिल्याने आम्ही अगदी बर्फाळ पाण्याने फक्त हात पाय धुतले. आणि तिथे सर्व काही गंगटोकहुन पुरवले जात असल्याने किमती छापील किमतीपेक्षा खूपच जास्त. असो. रात्रीचा मुक्काम लाचुंगला  करून दुसऱ्या दिवशी युंगथांग वैली कडे प्रस्थान केले. संपूर्ण मार्गात इतक्या विविध आकार आणि रंगाची फुले होती कि मनात विचार आला कि निसर्गाच्या रंगपेटीत जितक्या रंगांच्या छटा आहेत तितक्या रंगछटा जगातल्या कोणत्याही चित्रकाराच्या रंगपेटीत दिसणार नाहीत. युंगथान्गला मिनी स्वित्झरलँड असेही म्हंटले जाते. फुलांनी वेढलेल्या मार्गाने प्रवास करून आम्ही युंगथांग दरीत पोचलो. तेही एक सुंदर दृश्य. चहुबाजूनी हिमालयीन पर्वतशिखरांचा वेढा आणि मध्ये विस्तीर्ण असे पात्र, आणि त्या स्वच्छ पात्रातून वाहणारी लाचुंग नदी. स्वर्गीय दृश्य अगदी. पण थंडी मात्र अगदी गोठवणारी.
युमथांग मध्ये आल्यावर सोबतच एक लहानगा थंडी सहन न झाल्याने आणि प्रतिकार शक्ती अगदीच कमी असल्याने खूप आजारी पडला आणि आम्हाला स्नो पॉईंट न पाहता परत फिरावे लागले. तिथे नुकताच हिमवर्षाव होत होता पण आम्ही या अनुभवास मुकलो. हरकत नाही. There is always a next time . हिमवर्षावापेक्षा त्या लहान मुलाची प्रकृती महत्वाची होती. पण त्या मुलापेक्षाही  लहान असणारी त्याची आई मात्र खूप नाराज झाली तिथे न जाता आल्यामुळे. तरी आम्हाला परत निघावेच लागले. तिथल्या लोकांकडून अतिशय वाईट अनुभव मिळाल्याने आणि वीज नसल्याने हीटर भाड्यानेही  ना घेता आल्याने आम्ही न जेवता त्वरित बाहेर पडलो तिथून. पॅकेज मध्ये जेवण समाविष्ट असूनसुद्धा .
संध्याकाळी परत गंगटोक आणि दुसऱ्यादिवशी सकाळी बागडोगरा साठी टॅक्सी चा प्रवास.  बागडोगरा विमानतळावर लवकर पोचल्याने तिथल्या काही लोकांशी सहज बोलणे झाल्यामुळे कोलकात्याबद्दल बरीचशी माहिती मिळाली . बागडोगरा मधून  स्पाईसजेट ने कोलकाताकडे प्रयाण केले. तासाभराने कोलकात्यात पोचलो तर आधी कळवल्यामुळे  पूर्वीच्या हॉटेलने आम्हाला घेण्यासाठी टॅक्सी पाठवल्या होत्या. हॉटेल मध्ये फ्रेश  झाल्यानंतर, लगेच खरेदीला बाहेर पडलो. लोकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बस ने गरिया हाट ( बाजार ) येथे पोचलो.गोरिया हाट म्हणजे स्ट्रीट शॉपिंग साठी उत्तम ठिकाण. अलिबाबाच्या खजिनाच जणू. सर्व प्रकारचे कपडे, दागिने ,बॅग्ज , आणि बरेच काही, तेही अगदी कमी किमतीत. पण आम्ही डमडमहून तिथंपर्यंत पोहोचेपर्यंत बाजार बंद व्हायची वेळ झाली असल्यामुळे फारशी निवांत आणि मनसोक्त खरेदी नाही करता आली. पण जी झाली ती छान झाली.
दुसरा दिवस होताच हाताशी. त्यादिवशी आम्ही कालीघाट येथील कालीमातेचे सुप्रसिद्ध मंदिर, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निवास स्थान पाहायला गेलो. त्यानंतर आम्ही बोरा बाजार ( बडा बाजार) या ठिकाणी पुन्हा एकदा खरेदीला गेलो. श्रुती नुकतीच व्हायोलिन शिकू लागल्यामुळे, तिच्या सरांनी सांगितल्यानुसार आम्ही कोलकात्यातच व्हायोलिन ची खरेदी केली.. त्यानंतरच मग कापडांच्या बाजार मध्ये गेलो. तिथे मग मुलांचे कपडे वगैरे घेऊन, आणि थोडीफार सोबतच्या मैत्रिणीची खरेदी झाल्यानंतर तिथून बाहेर पडलो ते थेट हॉटेल मधून चेक आऊट करण्यासाठीच. पहाटे २ वाजता पुन्हा NTB एअरपोर्ट वरून विस्ताराचे विमान होते.
पण आठवड्याचा थकवा इतका होता कि विमानात बसल्याबसल्या सर्वाना झोप लागली. अगदी गाढ. जेवण वगैरे दिलेले ही कळले नाही कोणाला. पुण्याला पहाटे पोचल्यानंतरच डोळे उघडले.
या सहलीतील माणसांचे अनुभव म्हणाल तर कोलकात्यामध्ये सर्वच माणसे, मुले, पोलीस सर्वानीच मस्त सहकार्य केले आणि योग्य माहिती दिली. खूपच गोड माणसे खरोखर अगदी रसगुल्ल्यासारखी. अनोळखी शहरात बस, टॅक्सी ने फिरतानाही , खरेदी करतानाही कोणतीच अडचण आली नाही. पण सिक्कीमचा अनुभव अगदी वेगळा. तिथल्या टॅक्सिड्राइव्हर पासून बऱ्याच पुरुषांच्या उद्धटपणाचा पावलोपावली अनुभव आला. पण स्त्रिया मात्र अगदी नम्र, प्रामाणिक, कष्टाळू आणि प्रेमळ. त्यांना पर्यटकांची किंमत नक्कीच माहित आहे त्यांच्या इकॉनॉमी मध्ये. असो. चालायचेच.  प्रकारचे अनुभव गाठीशी असणेही गरजेचे आहे.
अशा पद्धतीने आमची एक सुंदर व अविस्मरणीय सहल पूर्ण झाली. आणि बऱ्याचशा स्मृती घेऊन आम्ही पुन्हा रिचार्ज होऊन परतलो, आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी.